(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अभियांत्रिकी शाखेपेक्षाही वैद्यकीय शाखेत विशेषत: एमबीबीएस प्रवेशासाठीची स्पर्धा कितीतरी पटिने तीव्र आहे. यंदा नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट – अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) या परीक्षेला देशभरातून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. याचा अर्थ २५ लाख विद्यार्थी व त्यांच्या पालकांचं स्वप्न हे एमबीबीएस डॉक्टर होण्याच्या दिशेनं जाणारं असल्याचं स्पष्ट होतं. संबंध देशात खाजगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २ लाखाच्या आसपास वेगवेगळ्या वैद्यकीय ज्ञानशाखांच्या जागा आहेत. यामध्ये एमबीबीएस प्रथम वर्षासाठी यंदा १ लाख ९ हजार आणि दंत वैद्यकशास्त्र (डेंटल) च्या २६ हजार जागांचा समावेश आहे. उर्वरित जागा या आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, युनानी, सिध्द मेडिसीन, व्हेटरनरी, नर्सिंग या शाखांसाठी आहेत. याचा अर्थ स्पष्टच आहे की २५ लाखातून केवळ दोन लाखाच्या आसपास विद्यार्थी हे वेगवेगळ्या वैद्यकीय ज्ञानशाखांसाठी पात्र ठरतील.

वाढती संख्या

गेल्यावर्षी २३ लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी दिली होती. यात यंदा २ लाख विद्यार्थ्यांची वाढ झाली. पुढच्या वर्षी यात आणखी इतकीच वाढ होईल. या तुलनेत वैद्यकीय शाखेतील पदवीच्या प्रथम वर्गाच्या जागा या अत्यल्प प्रमाणात वाढतील. कितीही नवी वैद्यकीय महाविद्यालये उघडली तरी २५ लाख विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या जागा काही  उपलब्ध होणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन यंदा व पुढच्या वर्षी (२०२६) वैद्यकीय प्रवेशासाठी किती आणि कसे परीश्रम करणार याची दिशा स्वयंस्पष्टपणे ठरवली पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्याची बौध्दीक कुवत लक्षात न घेता, त्याच्या पाठिमागे लागून, जगात  काहीही अशक्य नाही असा घिसापिटा उपदेश करुन त्याच्या डोक्यावर एमबीबीएसचे भूत बसवू नये.

बौध्दिक क्षमतेचा आरसा

९ वी ते ११ वीपर्यंतच्या विद्यार्थ्याची परीक्षेतील कामगिरी ही त्याच्या बौध्दिक क्षमतेचा आरसा ठरु शकतो. या आरशात स्वच्छपणे बघण्याची नजर पालकांना आली पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायानशास्त्र, जीवशास्त्र या तिनही विषयात  यथातथाच गुण किंवा अगदी ७०-७५ टक्के गुण पाल्याला मिळत असल्याचे दिसून आल्यास, २५ लाख विद्यार्थ्यांसोबतची त्याची स्पर्धा ही अत्यंत विषमच ठरेल हे लक्षात घ्यायला हवं. “हमखास यश” मिळवून  देण्याचा दावा करणारे कोचिंग क्लासेस अशा ७०-७५ टक्के गुणांच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फार फरक पाडू शकतील हे खात्रीने सांगता येत नाही. अशा संस्था सगळ्याच विद्यार्थ्यांबाबत गुलाबी चित्र निर्माण करतात. ते आभासी असल्याचं त्यांनांही ठाऊक असतं. हा आभास पालक आणि विद्यार्थ्यांनी ओळखणं गरजेचं असतं.

आवाका लक्षात घ्या

प्रत्येकाने‍ प्रवेश परीक्षेची संधी घेतलीच पाहिजे. मात्र आपला आवाका लक्षात घेऊन ही परीक्षा दिली तर पुढे नैराश्य येणार नाही. आपल्याला प्रवेश परीक्षेचा कितपत अभ्यासक्रम जमू शकतो, हे खरे तर कोचिंग क्लासच्या पहिल्या काही चाचण्यांमध्येही लक्षात येऊ शकते. त्यावर घरी पालकांसोबत आणि कोचिंग क्लासमधे तेथील संचालक किंवा समुपदेशकासोबत स्पष्ट चर्चा करायला हवी. पण तसे काही घडत नाही. ९ वी- १० वी पासून सुरु झालेला नीट प्रवेश परीक्षेचा प्रवास ११ वी, १२ वीमध्ये सुरु राहतो. या प्रवासातील खाचखळगे लक्षात घेतले जात नाहीत, त्यामुळे नीटच्या पहिल्या प्रयत्नात पडलेल्या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले जाते. पालकसुध्दा त्याला जबाबदार असतात. काही विद्यार्थी पुढे आणखी एक- दोन- तीन प्रयत्नांच्या पाठिमागे लागतात. कुणी किती वेळा परीक्षा द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असला तरी, कुठेतरी थांबायलाच हवं. कारण प्रत्येक प्रयत्नात वेळ जातो, पैसाही जातो नि त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसून आलंय. एमबीबीएस, डेन्टल या शाखांना प्रवेश मिळत नसल्यास वैद्यकीय क्षेत्रातील इतर ज्ञानशाखांच्या प्रवेशाचा विचार करायला हवा. मोकळ्या मनाने या शाखांचा स्वीकार केल्यास नि त्यात झोकून देऊन अभ्यास केल्यास जीवन यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं प्राप्त होवू शकतात. वैद्यकीय  क्षेत्रातील इतर ज्ञानशाखा या कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे तुम्ही त्यात किती प्रावीण्य मिळवता, त्यावरच तुमच्या यशाची उडी अवलंबून असते. एमबीबीएसला वा डेन्टलला प्रवेश नाही मिळाला म्हणजे, पुढे‍ आयुष्यात घोर अंधकार आहे, असे अजिबातच नाही. एमबीबीस पदवी मिळवणारे कदाचित चार पावलं समोर राहतील. कुणी किती समोर जावं, हे प्रत्येकाच्या बौध्दिक क्षमतेवर अवलंबून‍ असतं. त्यामुळे इतरांशी तुलना करण्यात काही हशील नसतो. वैद्यकीय क्षेत्रातील इतर ज्ञान शाखांमध्ये उत्तम ज्ञानप्राप्ती करुन त्याचा प्रभावी वापर केला तर एमबीबीएस इतकेच किंवा त्यापेक्षाही अधिक यश मिळवणारेसुध्दा अनेकजण असतातच.

जीवशास्त्राचे वास्तव

गणित आवडत नाही किंवा जमत नाही आणि जीवशास्त्र आवडतो म्हणून एमबीबीएस होण्याचं स्वप्न बघितलं जातं. जीवशास्त्र आवडतं म्हणजे नेमकं काय? हे ना पालक विद्यार्थ्यांना विचारत ना विद्यार्थी स्वत:चं आत्मपरीक्षण करत. जीवशास्त्रामध्ये गणिताची आकडेमोड नाही म्हणून ते सोपे किंवा अवघड नाही, अशी आपली पारंपरिक समजूत वर्षानुवर्षे तशीच आहे. ती बदलावी म्हणून शिक्षकसुध्‍दा आग्रही नसतात किंवा त्यांना त्याची गरज भासत नाही. पाठांतराने जीवशास्त्रात बरेच गुण मिळतही असतील. पण याचा अर्थ जीवशास्त्र समजलं  किंवा अजिबात अवघड नाही, असं समजणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करुन घेण्यासारखं ठरतं. जीवशास्त्रातील अनेक संकल्पना समजण्यासाठी कठीण असतात. त्या समजल्या नाहीत तर पुढे‍ या विषयातही गती प्राप्त करणं शक्य होत नाही. दुसरी बाब म्हणजे केवळ जीवशास्त्रात चांगलं जमून चालत नाही तर, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रही तोडीसतोड यायला हवं. नीटच्या परीक्षेत या दोन्ही विषयांवरचे प्रश्र असतात. बऱ्याच प्रश्नांचा आधार गणित राहू शकतो. त्यामुळे गणितीय संकल्पना स्पष्ट नसल्यास प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळणं अवघड जाऊ शकतं. पुढे एमबीबीएस करताना रसायनशास्त्राच्या आणि भौतिकशास्त्राच्या संकल्पाना स्पष्ट नसतील तर अभ्यासात‍ील प्रगती खुंटण्याची शक्यता असते. तेव्हा, १२वीमध्ये असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला जाण्याची आकांक्षा बाळगली असेल त्यांनी आपली रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रातील रुची आणि गती याचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा.

०००

दर्जेदार संस्था

एमबीबीएस व दंतवैद्यकीय शाखांमध्ये देशातील काही महाविद्यालयांनी गेली काही दशके सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. अशी काही महाविद्यालये  (अ) एमबीबीएस – (१) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस- नवी दिल्ली. (या संस्थेचा दर्जा आणि गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे. येथील शिक्षण तणावविरहित असते. संशोधन कार्यास अधिक प्राधान्य दिलं जातं. सांस्कृतिक वैविध्यतेमुळे विद्‌यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाचा चौफर विकास होतो. रुग्णांच्या बहुविविधतेमुळे वैविध्यपूर्ण वैद्यकीय कौशल्याचा विकास होतो.), (२) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्‍ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च- पुडुचेरी, (३) ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल- वेल्लोर, (४) आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज- पुणे, (५) मौलाना आझाद मेडिकल कॉलेज- नवी दिल्ली, (६) इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी- वाराणसी, (७) किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी – लखनौ, (८) वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज- नवी दिल्ली, (९) लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज- नवी दिल्ली, (१०) युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायंस- नवी दिल्ली.

 ०००

(ब) दंतवैद्यक (डेंटल) बीडीएस महाविद्यालये- (१) मौलाना आझाद इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंसेस – नवी दिल्ली, (२) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी -लखनौ, (३) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी- वाराणसी, (४) पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंस- रोहतक , (५) मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंसेस- मनिपाल, (६) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल- मुंबई, (७) नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज- मुंबई, (८) डॉ.जियॅऊदिृन अहमद डेंटल कॉलेज, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी-अलिगढ, (९) मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंसेस-मेंगळुरु, (१०) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल-नागपूर.

सुरेश वांदिले

 

 

अभियांत्रिकी शाखेपेक्षाही वैद्यकीय शाखेत विशेषत: एमबीबीएस प्रवेशासाठीची स्पर्धा कितीतरी पटिने तीव्र आहे. यंदा नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट – अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) या परीक्षेला देशभरातून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. याचा अर्थ २५ लाख विद्यार्थी व त्यांच्या पालकांचं स्वप्न हे एमबीबीएस डॉक्टर होण्याच्या दिशेनं जाणारं असल्याचं स्पष्ट होतं. संबंध देशात खाजगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २ लाखाच्या आसपास वेगवेगळ्या वैद्यकीय ज्ञानशाखांच्या जागा आहेत. यामध्ये एमबीबीएस प्रथम वर्षासाठी यंदा १ लाख ९ हजार आणि दंत वैद्यकशास्त्र (डेंटल) च्या २६ हजार जागांचा समावेश आहे. उर्वरित जागा या आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, युनानी, सिध्द मेडिसीन, व्हेटरनरी, नर्सिंग या शाखांसाठी आहेत. याचा अर्थ स्पष्टच आहे की २५ लाखातून केवळ दोन लाखाच्या आसपास विद्यार्थी हे वेगवेगळ्या वैद्यकीय ज्ञानशाखांसाठी पात्र ठरतील.

वाढती संख्या

गेल्यावर्षी २३ लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी दिली होती. यात यंदा २ लाख विद्यार्थ्यांची वाढ झाली. पुढच्या वर्षी यात आणखी इतकीच वाढ होईल. या तुलनेत वैद्यकीय शाखेतील पदवीच्या प्रथम वर्गाच्या जागा या अत्यल्प प्रमाणात वाढतील. कितीही नवी वैद्यकीय महाविद्यालये उघडली तरी २५ लाख विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या जागा काही  उपलब्ध होणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन यंदा व पुढच्या वर्षी (२०२६) वैद्यकीय प्रवेशासाठी किती आणि कसे परीश्रम करणार याची दिशा स्वयंस्पष्टपणे ठरवली पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्याची बौध्दीक कुवत लक्षात न घेता, त्याच्या पाठिमागे लागून, जगात  काहीही अशक्य नाही असा घिसापिटा उपदेश करुन त्याच्या डोक्यावर एमबीबीएसचे भूत बसवू नये.

बौध्दिक क्षमतेचा आरसा

९ वी ते ११ वीपर्यंतच्या विद्यार्थ्याची परीक्षेतील कामगिरी ही त्याच्या बौध्दिक क्षमतेचा आरसा ठरु शकतो. या आरशात स्वच्छपणे बघण्याची नजर पालकांना आली पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायानशास्त्र, जीवशास्त्र या तिनही विषयात  यथातथाच गुण किंवा अगदी ७०-७५ टक्के गुण पाल्याला मिळत असल्याचे दिसून आल्यास, २५ लाख विद्यार्थ्यांसोबतची त्याची स्पर्धा ही अत्यंत विषमच ठरेल हे लक्षात घ्यायला हवं. “हमखास यश” मिळवून  देण्याचा दावा करणारे कोचिंग क्लासेस अशा ७०-७५ टक्के गुणांच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फार फरक पाडू शकतील हे खात्रीने सांगता येत नाही. अशा संस्था सगळ्याच विद्यार्थ्यांबाबत गुलाबी चित्र निर्माण करतात. ते आभासी असल्याचं त्यांनांही ठाऊक असतं. हा आभास पालक आणि विद्यार्थ्यांनी ओळखणं गरजेचं असतं.

आवाका लक्षात घ्या

प्रत्येकाने‍ प्रवेश परीक्षेची संधी घेतलीच पाहिजे. मात्र आपला आवाका लक्षात घेऊन ही परीक्षा दिली तर पुढे नैराश्य येणार नाही. आपल्याला प्रवेश परीक्षेचा कितपत अभ्यासक्रम जमू शकतो, हे खरे तर कोचिंग क्लासच्या पहिल्या काही चाचण्यांमध्येही लक्षात येऊ शकते. त्यावर घरी पालकांसोबत आणि कोचिंग क्लासमधे तेथील संचालक किंवा समुपदेशकासोबत स्पष्ट चर्चा करायला हवी. पण तसे काही घडत नाही. ९ वी- १० वी पासून सुरु झालेला नीट प्रवेश परीक्षेचा प्रवास ११ वी, १२ वीमध्ये सुरु राहतो. या प्रवासातील खाचखळगे लक्षात घेतले जात नाहीत, त्यामुळे नीटच्या पहिल्या प्रयत्नात पडलेल्या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले जाते. पालकसुध्दा त्याला जबाबदार असतात. काही विद्यार्थी पुढे आणखी एक- दोन- तीन प्रयत्नांच्या पाठिमागे लागतात. कुणी किती वेळा परीक्षा द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असला तरी, कुठेतरी थांबायलाच हवं. कारण प्रत्येक प्रयत्नात वेळ जातो, पैसाही जातो नि त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसून आलंय. एमबीबीएस, डेन्टल या शाखांना प्रवेश मिळत नसल्यास वैद्यकीय क्षेत्रातील इतर ज्ञानशाखांच्या प्रवेशाचा विचार करायला हवा. मोकळ्या मनाने या शाखांचा स्वीकार केल्यास नि त्यात झोकून देऊन अभ्यास केल्यास जीवन यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं प्राप्त होवू शकतात. वैद्यकीय  क्षेत्रातील इतर ज्ञानशाखा या कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे तुम्ही त्यात किती प्रावीण्य मिळवता, त्यावरच तुमच्या यशाची उडी अवलंबून असते. एमबीबीएसला वा डेन्टलला प्रवेश नाही मिळाला म्हणजे, पुढे‍ आयुष्यात घोर अंधकार आहे, असे अजिबातच नाही. एमबीबीस पदवी मिळवणारे कदाचित चार पावलं समोर राहतील. कुणी किती समोर जावं, हे प्रत्येकाच्या बौध्दिक क्षमतेवर अवलंबून‍ असतं. त्यामुळे इतरांशी तुलना करण्यात काही हशील नसतो. वैद्यकीय क्षेत्रातील इतर ज्ञान शाखांमध्ये उत्तम ज्ञानप्राप्ती करुन त्याचा प्रभावी वापर केला तर एमबीबीएस इतकेच किंवा त्यापेक्षाही अधिक यश मिळवणारेसुध्दा अनेकजण असतातच.

जीवशास्त्राचे वास्तव

गणित आवडत नाही किंवा जमत नाही आणि जीवशास्त्र आवडतो म्हणून एमबीबीएस होण्याचं स्वप्न बघितलं जातं. जीवशास्त्र आवडतं म्हणजे नेमकं काय? हे ना पालक विद्यार्थ्यांना विचारत ना विद्यार्थी स्वत:चं आत्मपरीक्षण करत. जीवशास्त्रामध्ये गणिताची आकडेमोड नाही म्हणून ते सोपे किंवा अवघड नाही, अशी आपली पारंपरिक समजूत वर्षानुवर्षे तशीच आहे. ती बदलावी म्हणून शिक्षकसुध्‍दा आग्रही नसतात किंवा त्यांना त्याची गरज भासत नाही. पाठांतराने जीवशास्त्रात बरेच गुण मिळतही असतील. पण याचा अर्थ जीवशास्त्र समजलं  किंवा अजिबात अवघड नाही, असं समजणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करुन घेण्यासारखं ठरतं. जीवशास्त्रातील अनेक संकल्पना समजण्यासाठी कठीण असतात. त्या समजल्या नाहीत तर पुढे‍ या विषयातही गती प्राप्त करणं शक्य होत नाही. दुसरी बाब म्हणजे केवळ जीवशास्त्रात चांगलं जमून चालत नाही तर, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रही तोडीसतोड यायला हवं. नीटच्या परीक्षेत या दोन्ही विषयांवरचे प्रश्र असतात. बऱ्याच प्रश्नांचा आधार गणित राहू शकतो. त्यामुळे गणितीय संकल्पना स्पष्ट नसल्यास प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळणं अवघड जाऊ शकतं. पुढे एमबीबीएस करताना रसायनशास्त्राच्या आणि भौतिकशास्त्राच्या संकल्पाना स्पष्ट नसतील तर अभ्यासात‍ील प्रगती खुंटण्याची शक्यता असते. तेव्हा, १२वीमध्ये असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला जाण्याची आकांक्षा बाळगली असेल त्यांनी आपली रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रातील रुची आणि गती याचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा.

०००

दर्जेदार संस्था

एमबीबीएस व दंतवैद्यकीय शाखांमध्ये देशातील काही महाविद्यालयांनी गेली काही दशके सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. अशी काही महाविद्यालये  (अ) एमबीबीएस – (१) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस- नवी दिल्ली. (या संस्थेचा दर्जा आणि गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे. येथील शिक्षण तणावविरहित असते. संशोधन कार्यास अधिक प्राधान्य दिलं जातं. सांस्कृतिक वैविध्यतेमुळे विद्‌यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाचा चौफर विकास होतो. रुग्णांच्या बहुविविधतेमुळे वैविध्यपूर्ण वैद्यकीय कौशल्याचा विकास होतो.), (२) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्‍ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च- पुडुचेरी, (३) ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल- वेल्लोर, (४) आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज- पुणे, (५) मौलाना आझाद मेडिकल कॉलेज- नवी दिल्ली, (६) इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी- वाराणसी, (७) किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी – लखनौ, (८) वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज- नवी दिल्ली, (९) लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज- नवी दिल्ली, (१०) युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायंस- नवी दिल्ली.

 ०००

(ब) दंतवैद्यक (डेंटल) बीडीएस महाविद्यालये- (१) मौलाना आझाद इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंसेस – नवी दिल्ली, (२) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी -लखनौ, (३) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी- वाराणसी, (४) पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंस- रोहतक , (५) मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंसेस- मनिपाल, (६) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल- मुंबई, (७) नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज- मुंबई, (८) डॉ.जियॅऊदिृन अहमद डेंटल कॉलेज, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी-अलिगढ, (९) मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंसेस-मेंगळुरु, (१०) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल-नागपूर.

सुरेश वांदिले