(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

१० वीनंतर इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (आटीआय)(औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये तंत्रकौशल्य वाढीसाठीचे असंख्य अभ्यासक्रम चालवले जातात. दहावीनंतर करिअरची वाट चोखाळू बघणाऱ्यांसाठी आयटीआय उत्तम संधी उपलब्ध करुन देते. ही बाब गेली अनेक वर्षे सिध्द झाली आहे. जी मुलं अगदी मनापासून आयआयटीचे अभ्यासक्रम करतात आणि प्रशिक्षणाच्या कालावधीत कौशल्य हस्तगत करतात, ते स्वत:च्या पायावर लवकर उभे राहतात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतात. काही वर्षांच्या अनुभवनांतर ही मुले स्वयंरोजगारही सुरु करतात. काही मुलं, ज्या कारखान्यात, उद्योगात प्रशिणार्थी म्हणून लागली असतात, ती त्या ठिकाणी आपलं स्थान आणखी बळकट करतात. काही मुलं वरच्या श्रेणीतही जातात. आयटीआयचं हे महत्व आता बऱ्याच पालक आणि मुलांना पटू लागल्याचं सुचिन्ह आहे. त्यामुळे किंतु-परंतु मनात न ठेवता आणि दहावीतील भरमसाठ गुणांच्या कौतुकात वाहून न जाता बरीच मुलं आता आयटीआयला प्राधान्य देऊ लागली आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात आयटीआय प्रवेशामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचंही दिसतं. ९० टक्के  किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थीही आयआयटीचा रस्ता आनंदाने पकडतात.

महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक तालुक्यात किमान एक  (शासकीय अथवा खाजगी) आयटीआय आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी शासकीय आयटीआय आहे. या सर्व शासकीय आणि खाजगी आयटीआयमधून दरवर्षी किमान दीड लाख मुला – मलिंना शिल्प कारागिर योजनेतंर्गत तंत्रकुशल बनवलं जातं. केवळ तरुणींसाठी १५ ठिकाणी आयटीआय आहे. (याशिवाय प्रत्येक आयटीआयमध्ये ३० टक्के जागा विद्यार्थीनींसाठी राखीव असतात.) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी २ स्वतंत्र आयटीआय तर या सवंर्गातील उमेदवारांसाठी ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या  आहेत. आदिवासी उमेदवारांसाठी ६१,  शासकीय आदिवासी आश्रमशाळा आयटीआय – २८ , अनुसूचित जाती आणि नवबौध्द संवर्गासाठी उच्च स्तर आयटीआय – ४ आहेत. याशिवाय वर्धा येथे केवळ दिव्यांगासाठी आयटीआय आहे. द चिल्ड्रेन एड सोसायटी खाजगी औद्योगिक संस्था, मानखुर्द, कुर्ला मुंबई येथे केवळ अनाथ संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. द लेप्रसी मिशन, खाजगी शिक्षण संस्था पंचवटी, नाशिक येथील खाजगी आयटीआय मध्ये केवळ कुष्टरोगग्रस्त उमेदवारांना प्रवेश दिला जातो. क्विन्स मेरी खाजगी आयटीआय पुणे येथे संरक्षण सेवेतील व्यक्तिंच्या मुलांना प्रवेश दिला जातो.

महाराष्ट्रातील आयटीआयचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आयटीआय मधील शिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष कारखाना किंवा उद्योगातील यंत्रसामग्री हाताळण्याची अथवा त्यावर काम करण्याची संधी या योजनेंतर्गत संबंधित उमेदवारांना दिली जाते. राज्यातील ११ हजाराच्या आसपास उद्योग/कारखाने यामध्ये एक लाखाच्या आसपास अशी संधी उपलब्ध करुन दिली जाते. या काळात विद्यावेतन दिलं जातं. या काळात संबंधित उमेदवार कुशल कारागीर बनतो.

प्रशिक्षण

आयटीआयमधे एकूण ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये अभियांत्रिकी गटातील एक वर्षं कालावधीच्या २३ आणि दोन वर्षे कालावधीच्या ३२ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्षे कालावधीच्या २४ व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ११ अभ्यासक्रमांसाठी १० उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी अर्हता आहे. तर ६८ अभ्यासक्रमांना केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेच, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दिले जाते). या अभ्यासक्रमांमध्ये ७० टक्के भर प्रात्यक्षिकांवर व ३० टक्के भर सैध्दांतिक (थिअरी) वर दिला जातो.

इतर लाभ

१० वी उत्तीर्ण जे विद्यार्थी, आयटीआयचा २ वर्षे कालावधीचा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करुन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण करतात, त्यांना १२ वीच्या समकक्ष समजलं जातं. १० वी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांनी २ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण  करुन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण केल्यास त्यांना १० वीच्या समकक्ष समजलं जातं. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं, असेल त्यांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गाला थेट प्रवेश दिला जातो.

इतर वैशिष्ट्ये

शासकीय आयटीआयकडे शासनाने काळजीपूर्वक लक्ष दिले असल्याने, या सर्वच आयटीआयमध्ये उत्कृष्ट प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत. सर्वच शासकीय आयटीआयच्या स्वतंत्र आणि उत्तम अशा इमारती आहे. स्थानिक औद्योगिक गरजा लक्षात घेऊन या आयटीआयमध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. विविध विषयांमध्ये तंत्रकुशलता प्राप्त व्हावी म्हणून आयटीआय मध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमात काळानुरुप आणि गरजेनुसार बदल केले जातात. दहावीची परीक्षा ज्या जिल्ह्यातून दिली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ९० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

शासकीय आणि खाजगी आयटीआय मधील प्रवेश हे केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येतात. अशी पध्दत राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. या पध्दतीने सर्व प्रवेश प्रक्रिया या पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच होतात. त्यावर सर्वांनाच लक्ष ठेवणं शक्य होतं.

२०१९ सालापासून खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आयटीआयमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात येतात. अशा उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

वाढीव गुण

आयटीआय प्रवेशासाठी पुढील बाबींसाठी वाढीव गुण दिले जातात. (१) इंटरिजिएट चित्रकला परीक्षा (ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र.), (२) क्रीडा (सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र.), (३) तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी (माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) प्रमाणपत्रावर तांत्रिक विषयाचा उल्लेख असणं आवश्यक.), (४) माजी सैनिक (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आईवडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी (डोमिसाल) असल्याचं प्रमाणपत्र), (४) संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आईवडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचं प्रमाणपत्र.)

संपर्क- संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुख्य कार्यालय, महापालिका मार्गटपालपेटी क्रमांक- १००३६मुंबईदूरध्वनी- ०२२ – २२६२०६०३फॅक्स-२२६५९२३५, संकेतस्थळ- www.admission.dvet.gov.inईमेल –itiadmission@ dvet.gov.in

०००

किमान कौशल्याचे प्रशिक्षण

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, या विद्यापीठामार्फत किमान कौशल्यावर आधारित काही प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. हे प्रशिक्षण केल्यावर रोजगार – स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरु शकेल असं कौशल्य प्राप्त होऊ शकतं. यातील बहुतेक प्रशिक्षण हे अल्पमुदतीचे आहेत. त्यासाठी विशिष्ट अशी अर्हता नाही. मात्र आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या प्रशिक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

(१) यामध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. (२) वेगवेगळया तज्ज्ञांचं मार्गदर्शन. (३) यशस्वी उद्योगांना भेटी दिल्या जातात. (४) अद्ययावत प्रयोगशाळेत प्रशिक्षण दिलं जातं. (५) स्वंयरोजगार, व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं.

या प्रशिक्षणामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे- (१) कलम निर्मिती, (२) शोभिवंत झाडांची निर्मिती, (३) पुष्परचना व बोन्साय, (४) भाजीपाला रोपवाटिका, (५) हरीतगृहातील शेती, (६) गांडूळखत निर्मिती, (७) अळंबी उत्पादन, (८) कुक्कूट पालन, (९) शेळी व मेंढी संगोपन, (१०) दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, (११) फळ प्रकिया, (१२) नारळ प्रक्रिया, (१३) काजू बी प्रकिया, (१४) बेकरी उत्पादनं, (१५) कृषी अवजारांची देखभाल व दुरुस्ती, (१६) गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन , (१७) शोभिवंत माशांचं उत्पादन व मत्स्यालयाचं व्यवस्थापन, (१८) मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती.

या प्रशिक्षणाचा कालावधी २ ते ८ दिवसांपर्यंत विषयानुसार राहू शकतो. प्रशिक्षणाठी अल्प शुल्क आकारलं जातं. प्रशिक्षणाचा कालावधी ठरलेला असतो. त्याची माहिती विद्यापीठाच्या https://www.dbskkv.org/student/lower-education या संकेतस्थळावर दिली जाते. प्रसंगानुरुप होणारे बदलही येथे नोंदवले जातात.

संपर्क – सहयोगी अधिष्ठाता, निम्नस्तर कृषी शिक्षण, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली- ४१५७१२, दूरध्वनी- ०२३५८-२८२४११

 

 

सुरेश वांदिले