औरंगजेब काहीही करु शकतो !
सप्टेबर 1695 मध्ये गंज ए सवाई जहाज लुटलं गेलं. ते हज यात्रेवरुन मायदेशी म्हणजे हिंदुस्थानात येत होतं. हे हजाज होतं,आलमगीर औरंगजेबाचं. या जहाजातून त्याचे कुटुंबीय आणि सरदार घराण्यातील व्यक्ती हजच्या यात्रेला गेले होते. परत येताना, जहाजातील व्यक्तिंनी सोने- चांदी- दागिने- हिरे- मोती यांची मोठी खरेदी केली. हिंदुस्थानातून जातानासुध्दा या शाही जहाजातील राजघरण्यातील व्यक्तिंच्या इतमामास साजेशी प्रचंड संपत्ती या जहाजात होती. या जहाजाच्या संरक्षणाची चांगली आणि चोख खबरदारी ठेवण्यात आली होती. भरपूर सैन्य, तोफगोळा, बंदुका, जहाजावर होत्या. या जहाजावर हल्ला करुन ते लुटण्याचे धाडस करणे हे स्वत:हून तोफेच्या गोळ्यासमोर जाणे होते.
मात्र हे धाडस हेन्री अव्हेरी या समुद्री चाच्याने करावयाचे ठरवले. त्याने आपली ही कल्पना आणखी दोन तीन समुद्र चाच्यांनी सांगितली. सर्वांनी हे वेडे धाडस करण्याचे मान्य केले.
गंज ए सवाईने आतापर्यंत मोठे अंतर कापले होते. सुरत बंदर जवळ यायाला लागले. आतापर्यंतचा प्रवास विनासायासच झाला होता. त्यामुळे आता फार धोका नाही असे वाटल्याने जहाजावरील सुरक्षा सैनिक थोडे शिथील झाले. डोळयात तेल घालून सुरक्षेकडे लक्ष देण्याचे सोडून तेही प्रवाशांसोबत मौज मस्तीत सामील झाले. अशी गाफील अवस्था असताना हेन्ररी ॲवेरे आणि त्याच्या साथिदाराने जहाजावर हल्ला केला. जहाजावरच्या सुरक्षा सैनिकांना फारसा प्रतिकार करता आला नाही. बंदुका आणि तोफा फार काही कामी आल्या नाहीत…
हे जहाज ताब्यात आल्यावर तेथील अफाट संपत्ती बघून ॲव्हेरे आणि त्याच्या साथीदारांचे डोळे विस्फारले. सगळीकडे सोने- चांदी- मोती- हिरे-दागिने, इतर मौल्यावान धातू, तत्कालीन चलन अशी ती संपत्ती होती. हे जहाज या चाच्यांनी एका बंदराजवळ थांबवले. यातील संपत्ती बाहेर काढायला त्यांना सात दिवस लागले. त्यांचे जहाज या संपत्तीने भरुन गेले. त्यामुळे या चाच्यांनी गंज- ए-सवाई या जहाजाची मोडतोड केली. प्रवाशी आणि सैनिकांची कत्तल करुन हे जहाज सोडून दिले. अलोट संपत्तीने भरुन गेलेल्या जहाजातून हे चाचे पसार झाले.
औरंगजेब तेव्हा हिंदुस्थानचा जसा सम्राट होता तसाच जगातील शक्तीशाली सम्राटांपैकी एक होता. आपल्या जहाजावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा देण्याचे औरंगजेबाने घोषणा केली.
ॲवेरे हा इंग्रज असल्याने औरंगजेबाने, तेव्हा हिंदुस्थानात बस्तान बसवू पाहणा-या इस्ट इंडिया कंपनीस धारेवर धरले. कंपनीने ॲवेरेशी आपला काही संबंध नाही असे सांगून बघितले. मात्र औरंगजेब काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने इस्ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानातील व्यापारावर निर्बंध आणण्याची कार्यवाही सुरु केली.
कंपनीच्या विस्तारासाठी हे घातक असल्याने अखेर ॲवेरेला पकडून देण्याचे कंपनीने कबूल केले. त्यासाठी जगातील विविध भागात सैन्य पाठवले. पण या मोहिमेत ॲवेरे सापडलाच नाही. त्याच्याशी संबंधित काही माणसे कंपनीने पकडली पण ती नंतर त्याची नसल्याचे सिध्द झाले. औरंगजेबाची नाराजी अधिक वाढू नये म्हणून कंपनीने त्याला काही लाख रुपये देऊ केले.
ते त्याने घेतले नाही.
त्याला ॲवेरेच हवा होता.
पण ॲवेरे तर मिळत नव्हता….
गेला कुठे असेल हा ॲवेरे?
इस्ट इंडिया कंपनीलाही प्रश्न पडला..
कंपनीने खूप शोधाशोध केल्यावर ॲव्हेरेचा शोध घेण्याचा प्रयत्न सोडून दिला..
कंपनीचे कर्तेधर्ते या निष्कर्षावर आले की, हा ॲव्हेरे औरंगजेबालाच मिळाला असला पाहिजे.. जो आपल्या भावांना मारु शकतो. तो आपले जहाज कां लुटू शकत नाही.
औरंगजेब काहीही करु शकतो..असे कंपनीच्या कर्त्याधर्त्यांना वाटलं…
०००
काय हो बाबा तुम्हाला सुध्दा असच वाटतं नाही का? तेजोमयीने ही गोष्ट ऐकल्यावर बाबांना प्रश्न केला.
बाबा काही बोलायच्या आधी अलेक्झांडर- द डॉगीने मान डोलवली. याचा अर्थ त्यालाही पटलं होतं की औरंगजेब काहीही करु शकतो ते..
काय बाबा, अलेक्झांडरने त्याचं मत दिलं..तुम्हाला काय वाटतं?
अगं, या गोष्टीचा हा दुसरा कोन तुला आता सुचलाय…
पण औरंगजेबाचं व्यक्तीमत्व आणि त्याचा स्वभाव पाहता तो असं काहीही करु शकतो की नाही..
समजा त्याने हे असं केलं असेल तर ते कशासाठी बरं?
मला असं वाटतं बाबा, त्याला ॲवेरेच्या मदतीने समुद्रावर आपलं राज्य स्थापन करायचं असेल. इस्ट इंडिया कंपनीला अडचणित आणावयाचे असेल. आपली संपत्ती लुटल्या गेल्याचं दाखवून आणखी कर लावून हिंदुस्थानची पिळवणूक करायची असेल..
वा वा कल्पना विस्तार छान आहे..
किंवा मग बाबा..भविष्यात कुणीतरी या जहाजातील संपत्ती आणि ॲव्हेरचं पुढं काय झालं याच्या शोध मोहिमेवर कादंबरी लिहिण्याची संधी मिळावी अशी सुध्दा आलमगिराची इच्छा राहू शकेल..
औरंगजेबच तो, तो काहीही करु शकतो ना..
आँ..
हाँ बाबा..
बाबां इतकच अलेक्झांडरही आश्चर्यचकित झाला होता. त्या जहाजावर मी असतो तर असं काही नक्कीच होउु दिलं नसतं असे भाव त्याच्या चेहऱ्यावर निर्माण झाले..
अगं याला काहीतरी वेगळचं वाटतं..
बाबा म्हणाले..
काही वेगळं वाटत नसणार..
औरंगजेब काहीही करु शकतो, असंच त्यालाही वाटू असावं..काय रे ठोंब्या..आई त्याच्याकडे बघत म्हणाली..
आईच्या पलिकडे जाण्याची अलेक्झांडरची काय टाप होती. त्याने मुकाट्याने मान आणि शेपूट हलवून औरंगजेब काहीही करु शकतो, यावर शिक्कामोर्तब केलं.
सुरेश वांदिले